स्वावलंबन …

 

 लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

      मंजिरी, आज सकाळपासून खुशीतच होती त्याला कारणही तसंच होतं ,तिच्या सगळ्या मैत्रिणींनी आज 'पार्टी' चा बेत ठरवला होता. कधी एकदा कामं संपवते आणि पळते असं तिला वाटत होते, काम करता करता ती मनात काही मनसुबे रचित होती, काय बरं खायला नेऊया? कुठला ड्रेस घालूया? कुठला 'फॅमिली फोटो' दाखवायला नेऊया ? विचारांच्या तंद्रीत तिने सर्व कामे पूर्ण केली, मानस पाचवीत शिकत असल्यामुळे शाळा दुपारची होती, तिने त्याला स्कूल बस मध्ये चढवलं आणि सरळ मैत्रिणींकडे गेली. गप्पा -टप्पा, हसणं -खिदळणं, खाणं-पिणं यात संध्याकाळ कधी  झाली तिला कळलेच नाही. साडे -पाच वाजले तसे तिला घरचे वेध लागले. "मानस येईल आता मी निघते” ती म्हणाली, अगं आजी आहे ना घरी ! कशाला घाई करते उषा बोलली. "महेश पण येईल इतक्यात", ती म्हणाली.  आज, आईच्या हातचा चहा घेईल असे बोलून सगळ्याजणी हसू लागल्या


    नाही, नाही म्हणता मंजिरी सहा वाजता निघाली, घरी पोहचली, दरवाजा उघडला आणि बघते तर काय ! मानसचे 'सॉक्स' सोफ्याखाली लपले होते तर  'शूज ' दाराच्या आड बसले होते, 'डबा आणि बॉटल' बॅगेतून वाकुल्या दाखवत होते, 'युनिफॉर्म' जमिनीवर पहुडला होता, खाऊ मानसने खाल्ला की टेबलने? कळतच नव्हते. घराचा सीन पाहून तिचा आनंद कुठल्या कुठे पळून गेला.

    मानसssss मंजिरीचा आवाज वाढला, तुला जराही शिस्त नाही, स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवत नाहीस, किती हा आळशीपणा ! तू साधे स्वतःचे काम करत नाही तर इतरांना काय मदत करणार? तिच्या रागाचा पारा वाढत होता. घर आवरत, आवरत कसेबसे तिने रात्रीचे जेवण बनवले. जेवण झाल्यावर तिने महेशला संध्याकाळची परिस्थिती सांगितली, जरा ओरड 'लेकाला'. त्यावर तो हसत म्हणाला, "ते तर तुझे department आहे". तिने रागाने मान वळवली आणि झोपली.

    दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये टिचरने 'वाडा' येथील 'एकदिवसीय शिबिराची' माहिती सांगितली. तेथे तुम्हांला स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे, शारीरिक स्वच्छता तसेच परिसरातील स्वच्छता याबद्दल जन -जागृती करायची आहे, शिबिराला आलात तरचं १० मार्क्स मिळतील. खरंतर मानसाला अजिबात interest नव्हता, काम आणि मानस, दोघांचे सूर काही जुळत नव्हते. घरी एखादी वस्तू मिळाली नाही की, आई sss म्हणून ओरडायचा, लगेच वस्तू हजर. तो हसत मंजिरीला विचारायचा, "आई तुझ्याकडे जादूची छडी आहे का ?तुला कश्या वस्तू झटकन मिळतात". मंजिरी सांगायची अरे, वस्तू जागेवर ठेवल्या तर अंधारातही फारसे चाचपडावे लागत नाही, पण तो काही मनावर घ्यायचा नाही. घरी आल्यावर त्याने शिबिराबद्दल सांगितले, तसा महेश हसत म्हणाला, "अरे, तिथे स्वतःचे काम स्वतः करावे लागणार, 'assistant आई' नसणार आहे, तुला नाही जमणार बुवा! जाऊ दे १० मार्क्स. त्याने खूपच हट्ट धरल्यामुळे आई-बाबांनी त्याला पाठवायचे ठरवले. शुक्रवारी संध्याकाळी ७. ३० ला मुले स्कूलमध्ये जमली. जमेल ना त्याला! मंजिरी पाणावलेल्या डोळ्यांनी विचारात होती. अगं, त्याचे मित्र पण आहेत ना! शिबिराला सांभाळून घेतील, असे म्हणून महेश धीर देत होता. बस ८वाजता सुटली, पालक मुलांना 'All the Best' बोलून प्रोत्साहन देत होते, शेवटी bye -bye बोलून सर्व पालक घराकडे वळले.

    वाडा येथे पोहचल्यावर 'पाच मुलांचा एक ग्रुप' याप्रमाणे मुलांची विभागणी केली. Tent लावण्यात आले, मुलांनी सामान ठेवले आणि जेवणासाठी ग्राउंड वर हजर झाले,  भूक असेल तेवढेच अन्न घ्या, अन्न वाया घालवू नका, असे टिचर मुलांना वारंवार सांगत होत्या. जेवण झाल्यावर आपले ताट , वाटी, पेला स्वच्छ करून ठेवायचे होते , मानसने सवयीप्रमाणे तसेच ठेवले , ते पाहून टिचरने विचारले " घरी देखील असाच वागतो का ? तो चपापला . सर्वांची जेवणे उरकल्यावर टिचर आणि मुलांनी अंताक्षरी तसेच बैठे खेळ खेळले आणि नंतर झोपावयास गेले. प्रत्येकाने आपापले अंथरूण घालावयाचे होते , मानसचा चेहरा पाहून तुषार हसून म्हणाला " अरे , हे तर खूप सोप्पे आहे , मी तर आई - बाबांना पण अंथरूण घालून देतो ". मानस, तू तर साधी चादर पण घालत नाही , खरंच किती आळशी आहेस , मंजिरीचे बोलणे आता त्याला आठवू लागले .

    दुसऱ्या दिवशी नाष्टा मुलांच्या मदतीने बनवत होते त्यामुळे "चव आणि वेळ " या दोघांची सांगड घालणे चालू होते . टिचरने विचारले " आईला किचन मध्ये कोणकोण मदत करतात " बऱ्याच मुलांनी हात वर केले ते पाहून मानसने शरमेने मान खाली घातली .

   नाष्टा झाल्यावर मुले आजूबाजूच्या वस्तीत गेले , तेथील लोकांचे रहाणीमान , खायच्या सवयी पाहून ते थक्कच झाले . गरीब परिस्थितीमुळे हट्ट म्हणजे काय ? हे त्या मुलांना ठाऊक नव्हते , आई - वडिलांना कामात मदत करून मैलभर चालून शाळेला जातात हे ऐकून मुलांना फारच वाईट वाटले . टिचर म्हणाल्या " समजले ना आता , तुम्ही किती नशीबवान आहेत ते ! " सर्वकाही सहजपणे मिळते . त्यानंतर तेथील लोकांना स्वछतेबद्दल मार्गदर्शन केले , मुलांना खाऊ वाटण्यात आला , शालोपयोगी वस्तू देण्यात आल्या , मुलांच्या चेहऱ्यावर आनंददायी भाव दिसत होते.

    एव्हाना मानसच्या लक्षात आले , कि त्याच्याच वयाची मुले स्वतःचे काम तर करतातच पण त्याबरोबर आई-वडिलांना देखील मदत करतात , शाळेतही जातात , आता त्याला त्याच्या वागण्याची लाज वाटू लागली . सर्वांचा निरोप घेऊन बस सुटली, मुले उशिरा घरी परतली , मानस दमला होता , बॅगा कोपऱ्यात ठेऊन लगेच झोपला.

   दुसऱ्या दिवशी सकाळी मंजिरीने पहिले की मानसने बॅगा रिकाम्या करून वस्तू जागच्या जागी ठेवल्या होत्या , त्याचे वागणे पाहून ती चाटच पडली. तेवढ्यात त्याच्या आजीला ठसका लागला म्हणून ती पाणी आणण्यासाठी वळली , पण आज, तिच्या अगोदर मानसने पाण्याचा ग्लास आजीपुढे ठेवला , महेश आणि मंजिरी आ वासून पाहू लागले . तसा तो म्हणाला " स्वावलंबनाचा पहिला धडा मी गिरवायला सुरुवात केली आई ........


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमलं रे जमलं

आणि माझा . . . झाला

Second हनिमून... 🧡